वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध! अजित पवार
पुणे : आषाढी वारीनिमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान पोलिसांनी काही वारकाऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ प्रचंढ व्हायरल झाला आहे. दरम्यान आता या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
अजित पवार म्हणाले की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
हेह वाचा – विशेष लेख: विश्वविजेता होण्याची भारताची कुवत आहे का?
महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्ती परंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूर वारीसारख्या सोहळ्यात सहभागी होताना, सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून वारीत सहभागी व्हावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.