दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर ६० वर्षात पहिल्यांदाच भाजपची सत्ता

पुणे : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर संस्था स्थापनेच्या इतिहासापासून पहिल्यांदाच भाजपने झेंडा फडकवला आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून ६० वर्षात पहिल्यांदाच भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे दौंडचे आमदार राहुल कुल यांचे वजन वाढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे गणेश जगदाळे आणि उपाध्यक्षपदी शरद कोळपे विजयी झाले आहेत. त्यामुळे गेल्या २३ वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात यांच्या प्रतिष्ठेला सुरुंग लागला आहे.
बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १८ संचालक निवडून आले होते. राष्ट्रवादी आणि भाजपाचे प्रत्येकी नऊ सदस्य निवडून आले होते. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित संचालक संपत निर्माण निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे राष्ट्रवादीची एक जागा कमी झाली. दरम्यान, बाजार समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाकरिता निवडणूक लागली. नवडणकीमध्ये भाजपाच्या जगदाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाळासाहेब शिंदे तर कोळपे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वर्षा मोरे या उमेदवार होत्या. जगदाळे आणि कोळपे या दोघांनाही प्रत्येकी नऊ मते मिळाली. तर, शिंदे आणि मोरे यांना प्रत्येकी आठ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे यांनी या दोघांना विजयी घोषित केले.
हेही वाचा – ‘नसबंदी झाल्यावर मुलं होत नाहीत पण संजय राऊत..’; शिंदे गटातील नेत्याची खोचक टीका
बारामती लोकसभा मतदार संघात भाजपने लक्ष घालण्यास सुरुवात केल्यापासून भाजपचे वजन वाढताना पहायला मिळत आहे. जेव्हापासून समितीची स्थापना झाली तेव्हापासून यावर भाजपने आपला झेंडा रोवला नव्हता. मात्र आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी भाजपचे झाले आहे. त्यामुळे दौंड तालुक्यात राहुल कुल यांचे वजन वाढत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.





