“पुण्याची वाताहत व्हायला वेळही लागणार नाही”; राज ठाकरे
काही राजकीय प्रवक्त्यांना आपण काय बोलतोय ह्याचं कोणतंही भान राहिलं नाही
राजकारणात गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढला आहे
पुणे : मी पुण्यात भाषण करायचो तेव्हा सातत्याने म्हणायचो कि मुंबईची वाताहत व्हायला काही काळ गेला पण पुण्याची वाताहत व्हायला वेळही लागणार नाही इतकं पुणे नियोजनाशिवाय पसरतंय, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते पुण्यातील ‘सहजीवन व्याख्यानमालेत बोलत होते.
व्याख्यानामालेचं निमंत्रण आलं तेव्हा मी सांगितलं ‘नवं काहीतरी…’ ह्या विषयावर बोलायला आवडेल. ह्याविषयावर मी पक्षाच्या व्यासपीठावरून महाराष्ट्राशी संवाद साधणार होतोच. अनायसे ह्या सहजीवन व्याख्यानामालेचं निमंत्रण आलं म्हटलं तिथंच आपला हा नवा विचार मांडू.
महाराष्ट्रात सध्या रंगलाय तो फक्त कलगीतुरा. काही राजकीय प्रवक्त्यांना आपण काय बोलतोय, त्याचा परिणाम समाजावर कसा होणार आहे ह्याचं कोणतंही भान राहिलं नाही. आणि माध्यमही ह्या आरोप-प्रत्यारोपांना खतपाणी घालत आहेत. ज्या हिंदप्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं त्या आपल्या महाराष्ट्राची ही अशी केविलवाणी फरफट पाहून व्यथित व्हायला होतं. सध्याची राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहिली कि प्रश्न पडतो की हाच का तो महाराष्ट्र जो देशासाठी दिशादर्शक होता, असं राज ठाकरे म्हणाले.
१९९५ च्या आधीचा महाराष्ट्र आणि १९९५ नंतरचा महाराष्ट्र अशी विभागणी केली तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रचंड उलथापालथ झाल्याची जाणवते. एक काळ होता जेव्हा उच्चमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय हा श्रीमंत आणि गरीब वर्गामधील दुवा होता. गरीब, श्रीमंत, उच्चमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय ह्या सर्व वर्गात विचार करणारी माणसं होती ज्यांचा राजकारणावर धाक होता पण जेव्हापासून उच्चमध्यमवर्गीयांनी, मध्यमवर्गीयांनी राजकारणाला तुच्छ लेखलं आणि त्यांची पुढची पिढी परदेशात जाऊ लागली तेव्हापासून ऱ्हासाला सुरुवात झाली, असंही राज ठाकरे म्हणाले.
राजकारण गलिच्छ आहे, चिखल आहे… असं फक्त म्हणत घरी बसून बोटं मोडून चालणार नाही. काही होणार नाही ह्या देशाचं… हाच निराशावाद नव्या पिढीला परदेशात जायला भाग पाडतोय. आयुष्यात काही जमलं नाही म्हणून राजकारण अशी माणसं राजकारणात येऊ लागली. गुन्हेगारी वाढली, भ्रष्टाचार वाढला ह्याचं एकमेव कारण म्हणजे सुशिक्षित आणि सुज्ञांनी राजकारणाकडे पाठ फिरवली. आपलं संपूर्ण दैनंदिन आयुष्य राजकारणाशी बांधील आहे हे आपण विसरलोय. सकाळी येणाऱ्या दुधापासून, भाजीपाल्यापासून, अन्नपदार्थ, वीज, पाणीपुरवठा, औषोधोपचार ह्या सर्वांचे दर काय असावेत, त्याचा पुरवठा कुठे, किती असावा हे सर्व राजकारण ठरवतं आणि आपण त्याकडेच दुर्लक्ष करतोय, असं राज ठाकरे म्हणाले.