जगभरातील वन्यजीवांची संख्या ६९ टक्क्यांनी घटली
नागपूर : हवामानातील बदल आणि जैवविविधतेची हानी यामुळे जगभरातील वन्यप्राण्यांची संख्या गेल्या पाच दशकात ६९ टक्क्यांनी कमी झाली आहे. जागतिक वन्यजीव निधीच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ – वल्र्डवाईल्ड फंड) लिव्हिंग प्लॅनेट अहवालात निसर्गाच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला असून सरकार, नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांना जैवविविधतेचा नाश रोखण्यासाठी परिवर्तनात्मक कृती करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक पातळीवरच वसुंधरा दुहेरी आणीबाणीच्या मध्यभागी असल्याचा इशारा देखील या अहवालात दिला आहे.
निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे हवामानात बदल होत असून जैवविविधतेची हानी होत आहे. यामुळे वर्तमान तसेच भविष्यातील पिढय़ांचे जीवन धोक्यात आले आहे. जगातील सर्वाधिक जैवविविधता ज्या उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे आणि जिथे वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे, त्यावर सजीवसृष्टीच्या हानीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरात वन्यजीवांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे अधिवासाचा ऱ्हास आणि नुकसान, जंगलातील मानवी हस्तक्षेप, प्रदूषण, हवामान बदल आणि विविध संसर्गजन्य रोग आहे. प्रामुख्याने आफ्रिकेतील वन्यजीव संख्या ६६ टक्क्यांनी तसेच आशिया पॅसिफिकच्या एकूण सजीवसृष्टीपैकी ५५ टक्के सजीवांचा ऱ्हास होण्यामागे या घटकांचा वाटा आहे. जीवसृष्टीच्या निर्मितीच्या कालखंडापासून ते आजतागायत गोडय़ा पाण्यातील सजीवांमध्ये सरासरी ८३ टक्क्यांनी घट झाली आहे आणि ती कोणत्याही प्रजातीच्या गटातील सर्वात मोठी घट आहे.