ऋतुजा लटके शिंदे गटाच्या बाजूने लढणार?
मुंबई ।
अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधीच ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढीचं राजकारण सुरू झालंय. आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ऋतुजा लटके यांना एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी देऊन शिवसेना आणि भाजप युतीकडून रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे.
ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी भाजपकडूनही मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज अद्याप भरलेला नाही. ठाकरे गटाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं अनिल परबांनी सांगितले. परंतु ऋतुजा लटके यांचा महापालिकेतील राजीनामा प्रलंबित असून, आता पुढे काय होतं ते पाहावं लागणार आहे.
ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी असल्यानं त्यांच्या उमेदवारीपुढे प्रशासकीय अडचण येण्याची शक्यता आहे. महापालिका सेवा नियमावलीनुसार राजीनामा दिल्यानंतर किंवा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आता तो मंजूर व्हावा लागतो. विशेष म्हणजे ऋतुजा लटके यांनी रमेश लटकेंच्या निधनानंतर प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिलाय, परंतु अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परबांची चांगली धावाधाव सुरू आहे. परबांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची टीम महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाच्या येरझऱ्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा महापालिका आयुक्तांनी राजीनामा मंजूर केला नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे सहआयुक्त मिलिंद सावंत यांचीही भेट घेऊन त्यांना तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. प्रशासकीय सेवेत 20 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत यावर कार्यवाही करण्याची अपेक्षा असते, परंतु लटके यांनी राजीनामा देऊन अद्यापही तीन महिन्यांचा कालावधी लोटलेला नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा सेवा कालावधी तपासूनच त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करू, असंही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.