ब्रेकिंग न्यूज । शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती, निवडणुका एकत्र लढवणार
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खिळखिळ्या झालेल्या शिवसेना पक्षाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्याने भरारी घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. मातोश्रीवर शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी याबबातची सविस्तर माहिती दिली. संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने (Shivsena) एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे. या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , शिवसेना नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. न्यायालयातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वीच नांदेड उत्तरमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. बालाजी पेनूरकर, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, शहराध्यक्ष शुभम पाटील नादरे, तालुका सचिव ओम पाटील ढगे, शहर उपाध्यक्ष नागेश पाटील मोरे, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष अजय देणे, जिल्हा सचिव संतोष पाटील नादरे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष कैलास पाटील जोगदंड, तालुका संपर्कप्रमुख गोपाळ पाटील कदम, नायगावचे तालुकाध्यक्ष मारोती पाटील का होले, विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी माधव दाळपसे यांचा समावेश होता.