ताप (फ्लू) आणि करोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या मुंबईत काही ठिकाणी पुन्हा वेगाने
मुंबईः ताप (फ्लू) आणि करोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या मुंबईत काही ठिकाणी पुन्हा वेगाने वाढत असताना १२.७ टक्के करोनामुक्त रुग्णांमध्ये दीर्घकाळ लक्षणे दिसत असल्याचे ‘लॅन्सेट’ या महत्त्वाच्या वैद्यकीय संशोधनामध्ये दिसून आले आहे. आठपैकी एका रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसत असल्याचे या अहवालातून दिसून आले आहे.
संशोधकांनी करोना होऊन गेल्यानंतर दिसत असलेल्या पाच ते सहा महिन्यांपर्यंत लक्षणे दिसत असल्याचे सांगितले आहे. या रुग्णांमध्ये काही लक्षणे ही नवीन तर अनेक लक्षणे करोना संसर्गाच्या वेळी असलेली आहेत. करोना संसर्गाच्या लक्षणांमध्ये छातीमध्ये वेदना, श्वास घ्यायला त्रास, स्नायूंमध्ये वेदना, गंध तसेच चवीची संवेदना नसणे, हात दुखणे, घशामध्ये अडकल्यासारखे होणे, घाम येणे, थंडी वाजणे, उष्म्याची जाणीव होणे, हातापायामध्ये जडत्व अशा लक्षणे वारंवार अधिक प्रमाणात दिसून येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
तीन महिन्यांनंतरही या लक्षणांची तीव्रता काही रुग्णांमध्ये दिसून येत असल्याचे अभ्यासामध्ये दिसून आले आहे. तीन ते पाच महिन्यानंतर डोकेदुखी, डोळ्यांमध्ये जळजळ, पाठदुखी, थकवा ही लक्षणे दिसत नसल्याचे हा अभ्यास सांगतो. करोना संसर्गानंतर रुग्णांमध्ये दीर्घकाळ राहत असलेल्या लक्षणांचा अभ्यास करण्यासाठी पोस्ट करोना ओपीडी सुरू करण्यात आल्या होत्या. काही देशांमध्ये त्या बंद करण्यात आल्या. कोणत्या वयोगटामध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव कशा स्वरूपाचा होता याचा विस्तृत अभ्यास करण्याची गरज व्यक्त होत आहे. ज्या रुग्णांमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव दीर्घकाळ होता त्या रुग्णांमध्ये तो किती काळ राहिला हे पाहण्याची निकड, या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे.
विस्तृत अभ्यासाची गरज
करोना संसर्गाकडे जितक्या गांभीर्याने पाहण्यात आले तितक्या गांभीर्याने दीर्घकाळ लक्षणांकडे पाहण्यात आले नाही. त्यामुळे एकूण लोकसंख्येमध्ये करोनापश्चात किती रुग्णांना त्रास झाला, याचा विस्तृत अभ्यास करण्याची निकड हा अहवाल पुन्हा एकदा अधोरेखित करतो, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. या अभ्यासामध्ये ७६,४२२ जणांनी सहभाग घेतला होता. या सहभागी असलेल्या रुग्णांना चोवीस वेळा करोनाच्या संदर्भातील लक्षणांच्या तीव्रतेसंदर्भात विचारण्यात आले.