शिवसेनेला आणखी एका जिल्ह्यात खिंडार, शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात दाखल
![In another district of Shiv Sena, Khindar, hundreds of activists joined the Shinde group](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/In-another-district-of-Shiv-Sena-Khindar-hundreds-of-activists-joined-the-Shinde-group.png)
अमरावती : राज्यात शिवसेनेतील अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का मानला जातो. अशात आता अमरावतीमध्येही शिवसेनेला खिंडार पडलं आहे. कारण, शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. उपमहापौर ठाणे रमाकांत माडवी यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या दर्यापूर तालुका येथील गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला असून हा मतदार संघ अमरावतीचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा असून त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पाडली.
ठाणे येथील उपमहापौर क्रमांकात माडावी यांची अमरावती येथे आज गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान आज दर्यापूर इथे सुद्धा शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकाऱ्यांनी दर्यापूर इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांच्या गटात जाहीर प्रवेश केलेला आहे. या प्रवेशामुळे आता अमरावती जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
संजय मंडलिक यांचाही शिवसेनेला जय महाराष्ट्र
दरम्यान, शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिलेत ते अस्सल सोनं, असं म्हणणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेदेखील पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याच्या तयारीत आहेत. आज याबाबत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पक्षाचे दुसरे खासदार धैर्यशील माने हेदेखील याच मार्गावर असल्याचे समजते.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेने भगवा फडकवताना मंडलिक आणि माने यांना निवडून दिले. कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेवर सेनेचा झेंडा फडकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश अबिटकर यांच्या पाठोपाठ नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिंदे यांच्यासोबत बंडखोरीत सहभागी झाले. त्यानंतर कोल्हापुरातील दोन्ही खासदारांची नावे चर्चेत येऊ लागली, पण दोघांनीही आपण शिवसेना सोडणार नाही अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली.