उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का? किरीट सोमय्यांनी सांगितलं खरं कारण…
![देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का? किरीट सोमय्यांनी सांगितलं खरं कारण...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/देवेंद्र-फडणवीस-नाराज-आहेत-का-किरीट-सोमय्यांनी-सांगितलं-खरं-कारण.jpg)
मुंबई : राज्यात १० दिवस सुरू असलेलं सत्ता नाट्य संपल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी मुख्यमंत्री (CM) तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कारण देवेंद्र फडणवीसांकडे तब्बल १०५ आमदारांचा पांठिबा असतानाही त्यांनी उपमुख्यमंत्री पद का स्विकारलं, यावर बऱ्याच राजकीय चर्चा रंगल्या. पण याच मुद्द्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
देवेंद्र फडणवीसांवर अन्याय झाल्या असल्याच्या राजकीय प्रतिक्रिया येत असताना यासंबंधी विचारलं असता, किरीट सोमय्या म्हणाले की, ‘फडणवीसांवर अन्याय झाला नाही. पक्ष आणि महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. त्यामुळे मान-अपमान बाजूला ठेवत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार केला आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘फडणवीसांनी सरकार येताच आधी आरेचा मुद्दा मार्गी लावला. ठाकरे सरकारने अडीच वर्ष मेट्रोची वाट लावली. त्यामुळे आता पुन्हा मेट्रो रुळावर आणण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला.’ असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना सोमय्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली. या दोघांनी माफियागिरी केली. ED अधिकाऱ्यांवर FIR दाखल करण्याचा त्यांचा डाव होता, पण तो कोर्टानं हाणून पाडला. राऊतांवर कारवाई व्हायला पाहिजे असाही आरोप यावेळी किरीट सोमय्या यांनी केला आहे.