समाधानकारक पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या, राज्यातील शेतकरी हवालदिल
हिंगोली : यावर्षी हवामान विभागाने वर्तविवेला अंदाज जवळजवळ खरा ठरताना दिसत आहे. खरीपाच्या पेरण्या १५ जून नंतर होतील हे भाकित वर्तवण्यात आलं होतं. ते सुद्धा आता खरे ठरत आहे. ७० ते ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच खरिपाची पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी दिला आहे. मराठवाडा विभागात काल १५ जूनपर्यंत ६.३७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अद्याप दमदार पाऊस पडला नाही. मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे विभागात उशिरा पावसाला सुरुवात झाली असून, याचा परिणाम पेरणीवर झाला आहे.
बुधवारी लातूर आणि हिंगोलीत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. हिंगोली शहर व जिल्ह्यात मंगळवारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. लातुरात दिवसभर उकाडा जाणवला. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले व दुपारी ४ वाजेच्या सुमारास लातूर शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे बाजारात शेतकरी, व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंजगोलाई, दयानंद गेट, पाच नंबर चौक, रेणापूर नाका, राजीव गांधी चौक आदी भागातील हातगाडे व्यावसायिक, रयतू बाजारातील व्यापारी, शेतकऱ्यांनी पावसामुळे लवकरच दुकाने गुंडाळली. हरंगुळ बु, हरंगुळ खु., बसवंतपूर, खाडगाव, खोपेगाव आदी भागात जवळपास अर्धा तास रिमझिम पाऊस पडला.
दरम्यान, १४ जून रोजी हिंगोली जिल्ह्याचे तापमान कमाल ३३ तर किमान २४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत कडक ऊन पडले होते. दुपारी साडेतीन वाजता ढग जमायला सुरुवात झाली होती. त्यानंतर दुपारी चार ते साडेचार वाजेपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. जिल्ह्यातील कहाकर (बु.), केंद्रा (बु.), औंढा नागनाथ, रामेश्वरतांडा, आखाडा बाळापूर, कळमनुरी गोरेगाव आदी गावांमध्ये पावसाने दमदार अशी हजेरी लावली. मेघगर्जना होत असल्यामुळे दरम्यान काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला होता.तर आज सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा भल्या पहाटे यातील अनेक भागात पावसाने बॅटिंग केली. परंतु, अद्यापही काही भागात समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. मुसळधार पावसाच्या आगमनानंतर शेतकरी पेरणीला सुरुवात करणार आहे. कारण, शेतकऱ्यांना अगोदरच अभियानासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले तर आर्थिक अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे दमदार पावसाळ्यानंतर पेरणी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.