मुंबईत पश्चिम उपनगरात पाणीकपात; कधी आणि कुठल्या भागात? पाहा…
मुंबई : पश्चिम उपनगरातील अनेक भागातील रहिवाशांना मंगळवार, ३१ मे २०२२ ते बुधवार, १ जूनमध्ये पाणीकपातीस सामोरे जावे लागणार आहे. मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवार, १ जूनपर्यंत सकाळी ८.३० वाजेपर्यंत ही कपात लागू आहे. उत्तर मुंबईत त्याचा सर्वाधिक फटका बसणार असून त्यात मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसरमधील परिसराचा समावेश आहे.
मुंबई महापालिकेकडून आर/दक्षिण विभागात कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला वसाहतीत १,८०० मिमी जलवाहिनीसह १,५०० मिमी जलवाहिनी जोडण्याचे काम केले जाणार आहे. तसेच, कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज येथे १,८०० मिमी जलवाहिनी स्थलांतरित केली जाणार आहे. पालिकेमार्फत ही कामे मंगळवार ३१ मे रोजी सकाळी ८.३० वाजता सुरू होऊन बुधवार, १ जूनपर्यंत सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण केली जातील. त्यामुळे पालिकेच्या आर/दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व), आर/मध्य विभागातील बोरिवली (पूर्व), आर/उत्तर विभागातील दहिसर (पूर्व) पी/उत्तर विभागातील मालाड (पूर्व) परिसरातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.