भारतीय महिला हॉकी संघासाठी आज करो या मरो चा सामना

लंडन:आयर्लंड विरुद्ध पराभवाचा सामना केल्या नंतर स्पर्धेतील आव्हान संपण्याच्या काठावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला आजच्या अमेरिके विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्याची गरज असून किमान बरोबरी साधणे देखिल संघाच्या विश्वचषकामधिल पुढील वाटचाली साठी उपयुक्त ठरणार आहे.
पहिल्याच सामन्यात भारताला इंग्लंडवर विजय करण्याची संधी होती. मात्र, या सामन्यात भारताला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामन्यात 54 मिनिटे आघाडी राखल्यानंतर अगदी अखेरच्या क्षणी स्वीकारलेल्या गोलमुळे भारताला बचावाच्या आघाडीवर गांभीर्याने विचार करावा लागेल.
त्यातच क्रमवारीत भारतापेक्षा खालच्या स्थानावर असलेल्या आयर्लंड विरुद्ध 1-0 असा पराभव स्विकारल्या नंतर आता स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान डळमळीत झालेले आहे. कारण आयर्लंडने पहिल्या सामन्यात अमेरिकाचा पराभव केला होता त्यामुळे अमेरिकाचा संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे भारताला आजच्या सामन्यात त्यांच्यावर विजय मिळवणे अथवा बरोबरी साधने महत्वाचे आहे.
इंग्लंड सोबत 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर आयर्लंड कडून 1-0 असा पराभव स्विकारल्याने भारतीय संघ ब गटात तिसऱ्या स्थानी आहे. तर अमेरिकेचा संघ इंग्लंड विरुद्ध 1-1 बरोबरीनंतर आयर्लंड कडून 1-3 असा पराभुत झाल्याने गटात चौथ्या स्थानी आहे.
उद्या (रविवार) होणारा सामना हा आमच्यासाठी महत्वाचा सामणा असून या सामण्यात विजय मिळवने हेच आमचे ध्येय आहे असे भारतीय संघाचे प्रशिक्षक जुआर्ड मार्टीन म्हणाले आहेत. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतीय संघाला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पेनल्टी कॉर्नरचा फायदा मिळवता आला नाही. तर आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात आम्हाला अनेक संधी मिळुनही आम्हाला गोल करता आला नाही आम्ही या आमच्या चुकांमधून धडा घेत यशस्वी पणे तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहोत.
इंग्लंड विरुद्ध आम्हाला गोल करण्याच्या जास्त संधी मिळाल्या नसल्या तरी आयर्लंड विरुद्ध आम्ही तब्बल 15 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला अपयशाला सामोरे जावे लागले असेही ते यावेळी म्हणाले. त्याच बरोबर आजच्या सामन्यात आम्हाला आमच्या बचावा सोबतच आक्रमणा बाबतही नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याच बरोबर गट साखळीत पहिल्या दोन स्थानी असलेले संघ बाद फेरीत आपले स्थान पक्के करतात तर बाकीचे संघ हे चार जागांसाठी आणखीन सामन्यांमधून आपले स्थान निश्चीत करतात त्यामुळे स्पर्धेतील पहिला विजय मिळवून भारतीय संघ आव्हान राखण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्यामुळे आता नाही, तर नंतर कधीच नाही याच विचाराने भारतीय महिलांना मैदानात उतरावे लागेल.





