अब चंपाकली मुरझायी हैं, कोल्हापुरातही पराभव झाला, संजय राऊत यांचा चंद्रकांतदादांना टोला
पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी सेना स्टाईलने तुफान फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामे, हिंदुत्व, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबरची दोस्ती, सध्या ट्रेंडिंग असलेला भोंग्याचा विषय ते नुकताच कोल्हापूर उत्तरचा लागलेला निकाल, अशा चौफेर विषयांवर राऊतांनी भाष्य केलं. कोल्हापूरच्या महाविकास आघाडीच्या विजयावर बोलताना, “अब चंपाकली मुरझायी हैं,कोल्हापुरातही पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही”, असा टोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.
‘अब चंपाकली मुरझायी हैं!’
शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुण्यातील हडपसर येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी तुफान फटकेबाजी केली. कोल्हापूर उत्तरच्या विजयाबद्दल त्यांनी तमाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं तसेच नेत्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. “अब चंपाकली मुरझायी हैं, कोल्हापुरातही पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही”, असा टोला राऊतांनी लगावला.
‘आता पुणे तिथे काय उणे….’ असं संजय राऊत म्हणताच सभेत बसलेल्या लोकांमधून चंद्रकांत पाटील…चंद्रकांत पाटील असा आवाज आला. यावेळी राऊत म्हणाले, “अब चंपाकली मुरझायी हैं, उनकी बात छोड दो… कोल्हापुरातही त्यांचा पराभव झाला”
भाऊ मुख्यमंत्री झाल्यानेच भोंग्याचा त्रास, राऊतांचा राज ठाकरेंना टोला
मागील १५ वर्ष राज ठाकरे यांना भोंग्याचा त्रास झाला नाही, मग भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्यांना भोंग्याचा त्रास कसा व्हायला लागला, ही तर पोटदुखी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार कोरोनापासून पोटदुखीपर्यंत सगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी सक्षम आहे, असं सांगायला देखील राऊत विसरले नाहीत.
“राज ठाकरेंना १५ वर्ष त्रास झाला नाही का, मग त्यांनी त्या-त्यावेळी का आवाज उठवला नाही. विलासराव देशमुख यांचं सरकार होतं, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, नंतर त्यांचे लाडके फडणवीस यांचंही सरकार सत्तेत होतं, मग त्यावेळी त्रास का झाला नाही, आताच त्रास का व्हायला लागला. कारण भाऊ मुख्यमंत्री झाला ना… ही त्यांची पोटदुखी आहे”, असा टोला राऊतांनी लगावला.