राजस्थानपेक्षाही विदर्भ ‘गरम चल रहा…’; हवामान तज्ज्ञ म्हणाले…
नागपूर | यंदा एप्रिल महिन्यात विदर्भ प्रदेश राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक उष्ण प्रदेश ठरला. एल्डोरॅडो या जागतिक मान्यताप्राप्त संकेतस्थळानुसार, अकोला, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी या शहरांनी जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीतही अनेकदा स्थान मिळविले. एरवी देशातील सर्वाधिक उष्ण असणाऱ्या राजस्थानलासुद्धा यंदा विदर्भाने एप्रिल महिन्यात मागे टाकले. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे असे घडल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
सहसा मार्चच्या अखेरीस विदर्भ तापण्यात सुरुवात होते. या काळात विदर्भातील शहरे ही देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांच्या यादीत अग्रस्थानी असतात. पुढे एप्रिलच्या सुरुवातीपासून मात्र त्यात बदल होतात. या काळात राजस्थानातील तापमान वाढू लागते. तेथील गंगानगर आणि चुरू या शहरांमध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद होऊ लागले. यंदा मात्र तसे झाले नाही. यंदा राजस्थानातील तापमान वाढण्यात नेहमीच्या तुलनेत उशीर झाला. त्यामुळे या काळात विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि अकोला ही शहरे अग्रस्थानी होती. यंदा एप्रिल महिन्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वोच्च तापमानाचा विक्रमसुद्धा मोडीत निघाला. दरम्यान, नागपुरात सोमवारी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे ‘हॉट’
हिवाळ्यात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अर्थात पश्चिमी विक्षोपामुळे (वेस्टर्न डिस्टरबंसेस) उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचे वातावरण तयार होते. यंदा एप्रिलच्या अखेरीपर्यंत हे वारे येत राहिले. यामुळे उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. याचा परिणाम राजस्थानच्या तापमान वाढीवरही झाला. तेथील तापमान वाढण्यास उशीर झाला. यामुळे एप्रिल महिन्यात विदर्भ राजस्थानपेक्षा हॉट ठरला. महिनाअखेरीस मात्र स्थिती बदलली आणि राजस्थानातील तापमान वाढू लागले. पश्चिमी विक्षोप इतका उशिरापर्यंत का सुरू होता, याचा अभ्यास विविध देश करीत आहे.