breaking-newsपिंपरी / चिंचवड
मुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – सकल मराठा समाजाची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहीद काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनवणे व पोलीस हवालदार शाम काटगावकर यांच्या कुटुंबियास प्रत्येकी 50 लाख रुपये त्वरीत मदत द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी त्वरीत द्यावी. तसेच मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्र येऊन मराठा सामाजाच्या आरक्षणासह व इतर मागण्यांसाठी न्याय हक्कासाठी 58 मूक मोर्चे काढण्यात आले. पण त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही. मराठा बांधव काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनवणे यांनी आपले बलिदान दिले. तसेच पोलीस बंदोबस्तासाठी असलेले पोलीस हवालदार शाम काटगावकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या तिन्ही घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
तसेच या तिघांच्या कुटुंबीयांस प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत त्वरीत मिळावी. तसेच त्यांच्या कुटुंबास सरकारी घर कायमस्वरुपी देण्यात यावे. असे झाले नाही तर 4 ऑगस्टला शनिवार दुपारी बारा वाजता मी व माझे 10 कार्यकर्ते यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन बलिदान देणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची असेल असेही नमूद करण्यात आले. यावेळी धनाजी पाटील, वैभव जाधव, अमोल मानकर, प्रवीण बो-हाडे, भैय्यासाहेब गजधने, ज्ञानदेव लोभे, राजू पवार, राजेंद्र देवकर, अंतिम जाधव आदी उपस्थित होते.