२२ एप्रिलनंतर कोकणात जाणार आहात; परशुराम घाटात प्रवासाच्या दृष्टीने ‘हा’ महत्वाचा बदल
चिपळूण|कोकणातील परशुराम घाटातील वाहतूक महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी २२ एप्रिलपासून दुपारी १२ ते ५ कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. काल चिपळूण येथे पार पडलेल्या स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २० ऐवजी आता २२ एप्रिल पासून अंदाजे महिन्याभरासाठी परशुराम घाटातील रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर चालणार आहे.
लोटे एमआयडीसीतील कंपन्यांकडून स्थानिक प्रशासनाकडे नियोजनासाठी दोन दिवसांची मुदत मागण्यात आली होती. त्यामुळे आता दिनांक २२ एप्रिलपासून परशुराम घाटातील वाहतुकीबाबतचे बदल लागू होतील अशी माहिती बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली.
यासाठी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. परशुराम घाटपरिसरात पर्यायी मार्गाबाबत त्यांनी पाहणीही केली. तसेच वाहतूक पर्यायी मार्गे वळवताना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चार ठिकाणी पोलीस चौकी उभारली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या काळात लहान वाहने, राज्य परिवहन मंडळाची वाहने आणि लोटे एमआयडीसीतील बसेसची वाहतूक ही लोटे-चिरणी-आंबडस मार्गे चिपळूण अशी सुरू ठेवणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, याबाबत महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून संबंधित वाहतूक ही दिनांक २२ एप्रिल २०२२ पासून बंद राहणार असल्याची माहिती हाती आली आहे.