रावेत येथे सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून
पिंपरी l प्रतिनिधी
रावेत येथे एका सुरक्षा रक्षकाच्या जागेवर काम करण्यावरून झालेल्या वादातून सुरक्षा रक्षकाने दुस-या सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना शनिवारी (दि. १६) मध्यरात्री साडेबारा वाजता कोहिनूर बिल्डिंगच्या पाठीमागे मोकळ्या जागेत घडली.
बिट्टू यादव उर्फ ऋषिपाल सिंह सुरेंद्र सिंह (वय ४६, रा. चंदरपुरा, ता. सरसई नावरइटावा, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी संजय दामोदर चौहान (वय २५, रा. ग्रामदुबारी, मधुबन, महू, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश नागरगोजे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बिट्टू यादव हा काम करत असलेल्या जागेवर आरोपी संजय याला सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे होते. त्यावरून त्यांच्यात शुक्रवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता भांडण झाले. त्याचा राग संजय याच्या मनात होता. त्याने शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास बिट्टू याच्या डोक्यात, चेह-यावर दगडाने मारून त्याला गंभीर जखमी करून खून केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.