breaking-newsराष्ट्रिय
गो तस्करी हत्यांबाबत केंद्रीय मंत्री मेघवाल यांचे वादग्रस्त विधान
नवी दिल्ली: राजस्थानच्या अल्वरमध्ये गो-तस्करीच्या संशयावरून एका युवकाची हत्या करण्यात आली होती. य हत्येबाबत केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जसजशी वाढत जाईल, तसतशा अशा प्रकारच्या घटना वाढत जातील, असे मेघवाल यांनी म्हटले आहे. अशा हत्यांमागे काही कटकारस्थाने असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बिहार निवडणुकांच्या काळात ऍवार्ड वापसी किंवा उत्तर प्रदेशात मॉबलिंचिंग प्रकारांना जोर आला होता, त्याचप्रमाणे आता राजस्थानात गो तस्करी हत्याकांडांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता लोकसभा निवडणुका जवळ येतील तसे “असहिष्णुता’ सारखे प्रश्न निर्माण केले जातील पंतप्रधानांनी नवनवीन योजना दिल्या आहेत आणि त्यांचा परिणामही दिसू लागला आहे. तेव्हा त्याविरुद्ध अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नूह हरियाणातील अकबर खानची जमावाने मारहाण करून हत्या केली. तो दोन गायी घेऊन रामगडमधील ललावंडी गावातून जात होता, तेव्हा गो तस्कर समजून त्याला आणि त्याच्या साथीदाराला जमावाने मारहाण सुरू केली. अकबरचा साथीदार प्राण वाचवून पळून गेला, पण अकबर वाचू शकला नाही. पोलीस हॉस्पिटलला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
अशा प्रकारांना आळा घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने चार दिवसांपूर्वीच केंद्र आणि राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत होऊ नये. गो तस्करी प्रकरणात कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.