हिंगोलीतील उड्डाण पूल संथ गतीने; ठेकेदारावर कारवाईची मागणी
- खासदार हेमंत पाटील यांच्याकडून कानउघाडणी
हिंगोली |
शहरातील खटकाळी येथे रेल्वे उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने कमालीचे दुर्लक्ष केल्याने या कंत्राटदारास काळय़ा यादीत टाकावे व वळणमार्ग न केल्याने कारवाई करावी अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने कारवाई केली जाईल, असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला आहे. या प्रश्नी त्यांनी रेल्वे अभियंता प्रणय गायकवाड यांना धारेवर धरले.
हिंगोली येथील या उड्डाणपुलाचे काम मागील दोन ते अडीच वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मूळ कंत्राटदाराऐवजी इतर दुसराच कोणीतरी काम करीत असल्याचे सांगण्यात येते. हे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहने चालविणे अवघड झाले आहे. दोन्ही बाजूने मुरूम टाकून रस्ता सुरक्षित करण्यासाठीही प्रयत्न झाले नाहीत. याबाबत जिल्हाधिकारी यांनाही तक्रार केली होती.
या भागात सात ते आठ जणांचे अपघात झाले असून अनेकांचे हात,पाय मोडले आहेत. अनेकांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी कंत्राटदारांच्या अभियंत्यांची कानउघाडणी केली. अनेक दिवसांपासून या रस्त्यांबाबत नागरिकांत ओरड आहे. माध्यमांतूनही ही समस्या अनेकदा मांडण्यात आली. मात्र,रेल्वेचे अधिकारी लक्ष देत नाहीत. नऊ कोटी रुपये उचलूनही रस्ता होत नसल्याने हा प्रश्न शिवसेना हातात घेईल, असे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.