पाचही राज्यांमध्ये चुरशीची लढत; कोण मारणार बाजी?
नवी दिल्ली | पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपासोबत हातमिळवणी केली. तर, आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली होती. त्यामुळे आपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल. एग्झिट पोलमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही.
पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पंजाबमध्ये कमी मतदान झालं आहे. 20 फेब्रुवारी रोजी राज्यात सुमारे 71.95 टक्के मतदान झालं. आज, 10 मार्च रोजी पंजाबच्या 117 जागांच्या निकालांसाठी मतमोजणी केली जात आहे. राज्यात 66 ठिकाणी 117 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या 117 मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 45 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेश राज्याला राजकीयदृष्ट्या एक वेगळंच महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. या सर्व जागांचे निकाल आज स्पष्ट होणार आहेत.
गोवा विधानसभा ही देशातल्या सर्वात छोट्या विधानसभांपैकी एक आहे. मोजून 40 जागा असलेली ही विधानसभा तरीही साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेत आहे. 40 पैकी 21 हा बहुमताचा आकडा कोण गाठतो हे महत्त्वाचे आहे, तसेच या आकड्याच्या जवळपास पोहोचणारे कोण आहेत हेही औत्सुक्याचे आहे. महाराष्ट्राचा हा सख्खा शेजारी असल्याने आणि सांस्कृतिकदृष्ट्या जवळीक मोठी असल्याने महाराष्ट्राचे तर अधिक लक्ष या निवडणुकीकडे आहे.
उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. उत्तराखंडमध्ये कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता, तरी भाजपाने नेतृत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत, तर आपने अजय कोठियाल यांना दिली होती.
60 विधानसभा जागा असलेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतून कल हाती येताना दिसत आहेत. एकूण 60 जागांपैकी 10 जागांचे कल हाती आले असून भाजपा आणि काँग्रेसने प्रत्येकी चार-चार जागांवर आघाडी घेतली आहे, तर एनपीपी आणि एनपीएफ एका-एका जागेवर आघाडीवर आहे.