पुण्यातील बॅनरबाजीवरून आमदार बच्चू कडूंचा राष्ट्रवादीला टोला; म्हणाले,..
राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मूर्खता आहे
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. पुण्यात राष्ट्रवादीने बॅनर लावत ही मागणी केली आहे. यावरून बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मूर्खता आहे. हे त्यांनी अज्ञानातून केलं आहे. या अज्ञानपणामुळेच त्यांची सत्ता नेहमी जाते आणि भारतीय जनता पार्टी त्याचा फायदा घेते. मुळात मला जी शिक्षा सुनावली आहे ती दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आहे. त्यापैकी एक गुन्हा हा भारतीय दंड विधानाच्या कलम ५०४ अंतर्गत आहे, तर दुसरा भादंवि ३५३ या कलमाअंतर्गत आहे. एकाच गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली असती तर मी अपात्र ठरलो असतो. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा असेल तर उमेदवार अपात्र ठरत नाही, असं आमदार बच्चू कडू म्हणाले.
मुळात नियम काय सांगतो तर एकाच गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली असेल आणि उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली नाही तर उमेदवाराचं सदस्यत्व रद्द होतं, हे स्पष्ट आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.