जम्मू-काश्मीरमध्ये ४ अतिरेक्यांना अटक
श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. भारतीय जवानांनी लष्कर-ए-तैयबाच्या चार अतिरेक्यांना अटक केली. पोलिसांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. गुप्तचर माहितीनुसार कारवाई करत सुरक्षा दलांनी सोपोरमधील रफियाबादच्या नदिहाल भागाला वेढा घालून अतिरेक्यांची शोध मोहीम सुरू केली होती. त्यात या चौघांना पकडण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.
चेक सेरी पट्टणचा रहिवासी फिरदौस अहमद वानी, वागम येथील रहिवासी आमिर नजीर हजार, सुहैल अहमद भट आणि बशीर अहमद गनी यांचा मुलगा नसीर हुसेन अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासादरम्यान ते अतिरेकी आरिफ हजार उर्फ रेहानचे सहकारी म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे