बुरहान वाणी मृत्यूदिनी काश्मीरात प्रतिबंधात्मक उपाय
श्रीनगर – काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा चेहरा असलेला बुरहान वाणी याच्या मृत्युच्या द्वितीयवर्ष पुर्ती दिनी म्हणजेच उद्या 8 जुलैला काश्मीर खोऱ्यात पुन्हा हिंसक घटना घडण्याची शक्यता असल्याने ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
बुरहान वाणीला सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीच्यावेळी 8 जुलै 2016 रोजी ठार केले होते. तो हिजबुल मुजाहिदीन संघटनेसाठी काम करीत होता. तो मुळचा त्राल गावातील रहिवासी होता. त्यामुळे या गावात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच श्रीनगर शहराच्य नौहट्टा आणि मैसुमा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच घातक कृत्ये करणाऱ्यांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुरहान च्या हत्येची तीव्र प्रतिक्रीया काश्मीर खोऱ्यात उमटली होती व त्याच्या मृत्यूनंतर सतत चार महिने काश्मीरात हिंसक प्रकार होत राहिले होते. त्यात किमान 85 जण ठार तर अन्य अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान असिया अंद्राबी हिला एनआयएच्या ताब्यात देऊन तिला दिल्लीला हलवण्यात आल्याच्या निषेधार्थ फुटीरवादी संघटनांनी आज बंद पुकारला होंता. त्याला मात्र काश्मीरात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.