सिंधुदुर्गातील विजयानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आता लक्ष्य…”!
![ED notice prepared for four on Matoshri, Narayan Rane's explosive tweet](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Narayan-Rane2.png)
मुंबई |
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे निकाल आज हाती आले असून त्यामध्ये नारायण राणे यांच्या सिंद्धिविनायक पॅनलचे ११ संचालक निवडून आले आहेत. भाजपाचे ११ संचालक आणि विरोधी पॅनलचे ८ संचालक निवडून आल्यानंतर भाजपानं या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, या विजयानंतर आता लक्ष्य राज्यातली सत्ता असल्याचं देखील विधान करत राणेंनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.
- “ज्यांना अक्कल आहे, त्यांना…”
या निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबाबत बोलताना नारायण राणेंनी विरोधी पॅनलवर अर्थात महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत निशाणा साधला. “भाजपाची सत्ता आली आहे. माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत नितेश राणेनं घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला”, असं राणे म्हणाले. “विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.
- “नको असलेले चेहरे…”
दरम्यान, जिल्हा बँकेतील या मोठ्या विजयानंतर आता पुढील नियोजन काय असेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच नारायण राणे यांनी राज्यातील सरकारकडे रोख करत “आता यानंतरचं लक्ष्य महाराष्ट्रातील सत्तेचं आहे”, असं राणे म्हणाले. “आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार. तिन्ही जिल्ह्यात ज्या काही विधानसभा होतील, त्यासोबत लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. नको असलेले, ज्यांचे चेहरे पाहवत नाहीत, अशा लोकांना आमचा जिल्हा लोकप्रतिनिधीपदी ठेवणार नाही”, असा खोचक टोला नारायण राणेंनी यावेळी लगावला.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे,नेत्यांचे आणि मतदारांचे आभार.
राणे परिवाराच्या विरोधात सूडबुद्धीने कट-कारस्थान केल्यास जनता कशा प्रकारे धडा शिकवते,हे संबंधितांना चांगलंच कळलं असेल अशी अपेक्षा आहे. @BJP4Maharashtra
— Narayan Rane (@MeNarayanRane) December 31, 2021
- राज्याला लगानची टीम नकोय…
यावेळी बोलताना नारायण राणेंनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर खोचक शब्दांत टोला लगावला. “आता महाराष्ट्राकडे लक्ष्य म्हणजे तिथे थोडक्यात आमची सत्ता हुकली आहे. राज्याला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. हे राज्य किमान १० वर्ष तरी अधोगतीकडे चाललंय. आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाय, लगानची टीम नकोय”, असं राणे यावेळी म्हणाले.