एेन पावसाळ्यात पाणी टंचाईवरुन नगरसेवकांना महिलांनी घेतले फैलावर
पिंपरी – महापालिकेच्या अनेक भागात पाणी टंचाईला सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यात आकुर्डी परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये महिलांनी नगरसेवकांना पाणी टंचाईवरुन फैलावर घेतले. तसेच प्रभागात पाणी पुरवठा कधी सुरळीत झालाय का? असा सवाल केल्याने लोकप्रतिनिधींना महिलांच्या प्रश्नाची सरबत्ती उडाली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधील काळभोर नगर, मोहननगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन यासह अन्य परिसरात महिलांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रभागातील पाणी प्रश्नावर नागरिक आणि स्थानिक नगरसेवक यांच्यात प्रश्न-उत्तराचे चर्चासत्र रंगले होते. यावेळी अ प्रभाग समितीच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेक प्रमोद कुटे, वैशाली काळभोर, स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजू दर्गे उपस्थित होते.
प्रभागातील पाणी प्रश्नावर महिलांनी केलेल्या प्रश्नावर उत्तरे देताना नगरसेवकांची दमछाक झाली. पाणी टंचाईने नागरिक पुरते हैराण केले आहे. त्यांचा रोष त्यांच्या बोलण्यातुन दिसुन येत होता. प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता थेट लोकप्रतिनिधींना समोरासमोर जाब विचारण्याच्या मिळालेल्या संधीचा नागरिकांनी पुरेपुर लाभ उठविला. १५ जुलैच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे नगरसेवकानी आश्वासन दिले.
यावेळी काळभोर नगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकासह महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केले. तर आमीन भाई यांनी आभार मानले.