ममता बॅनर्जी ५० हजार मतांनी विजयी होतील; निकालाआधीच तृणमूल नेत्यांचा दावा
पश्चिम बंगाल |
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी या कायम राहणार की नाही याबाबत आज निर्णय होणार भोवानीपूर पोटनिवडणुकीत होणार आहे. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भोवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आज येणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरु केली आहे. मात्र भोवानीपूर येथील कमी मतदानानंतर तृणमूलच्या नेत्यांनी रविवारी मतमोजणीच्या काही तास आधी ममता बॅनर्जी पोटनिवडणूक जिंकतील असे म्हटले आहे. मार्च-एप्रिल विधानसभा निवडणुकीत भोवानीपूरची जागा जिंकलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यापेक्षा जास्त फरकाने त्या निवडणून येतील असे तृणमूलने म्हटले आहे.
३० सप्टेंबरच्या पोटनिवडणुकीत भोवानीपूरच्या २,०६,३८९ मतदारांपैकी केवळ ५७.०९ टक्के मतदान झाले. तर २६ एप्रिल रोजी चट्टोपाध्याय यांनी निवडणूक लढवली तेव्हा हा आकडा ६१.७९ टक्के होता. चट्टोपाध्याय २८,७१९ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. तृणमूल नेत्यांनी शनिवारी रात्री दावा केला की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ५०,००० पेक्षा जास्त मतांनी जिंकणार आहेत. विधानसभा निवडणुकीत तृणमूलने बंगालच्या २९४ जागांपैकी २१३ जागा जिंकल्या आणि भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला होता. पण पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम येथे बॅनर्जी यांचा भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता. त्यामुळे चट्टोपाध्याय यांनी भोवानीपूरची जागा रिकामी केली जेणेकरून बॅनर्जी त्यांच्या जुन्या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवू शकतील आणि मुख्यमंत्रीपदी राहू शकतील.