चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्याला काँग्रेस घाबरत नाही – पटोले
राज्यात सध्या किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आरोप करण्याची मालिका सुरु केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील इतर काही नेते सुद्धा भाजपच्या रडारवर असल्याचे समजते आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यानंतर काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा दिला. यावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याला घाबरत नसल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भाजपने घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सध्या हसन मुश्रीफ यांच्या कथित घोटाळ्यांवरुन त्यांच्याविरुद्ध ईडीकडे तक्रार दाखल असल्याचे सांगितले आहे. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी देखील काँग्रेसला इशारा दिला. त्यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रसला प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रात ब्लॅकमेलींग करणारे सरकार असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याला काँग्रेस घाबरत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांमुळे आता राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार असल्याची शक्यता आहे.