IPL 2021: “म्हणून आम्ही हारलो”; पोलार्डची प्रामाणिक कबुली
![IPL 2021: "So we lost"; Pollard's sincere confession](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Pollard_Mumbai_Indians.jpg)
युएईमध्ये रंगलेल्या IPLच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईच्या संघाने विजयी सलामी दिली. चेन्नईने मुंबई संघावर २० धावांनी विजय मिळवला. ऋतुराज गायकवाडच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर चेन्नईने १५६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पोलार्डच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला २० षटकात केवळ १३६ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मुंबईचे नक्की काय चुकलं? याबद्दल पोलार्डने प्रामाणिक कबुली दिली.
“ऋतुराज गायकवाड याने उत्कृष्ट फलंदाजी केली. टी२० क्रिकेट सामन्यात जर एखादा फलंदाज पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत पिचवर तळ ठोकून उभा राहत असेल तर तो प्रतिस्पर्धी संघाला चांगलाच महाग पडतो. आमच्या गोलंदाजांनी योग्य पद्धतीने डावाची सांगता केली नाही. आमच्याकडून २० धावा जास्त दिल्या गेल्या. पिच गोलंदाजीसाठी उत्तम होतं. नवा चेंडू स्विंग होत होता. आमच्या गोलंदाजांनी झटपट बळी टिपले होते. पण ती लय आम्हाला कायम ठेवता आली नाही”, असं पोलार्डने कबूल केलं.
“फलंदाजीच्या मुद्द्यावर बोलायचं झालंच तर चेन्नईने दीडशेपार धावसंख्या उभारली. हे आव्हान पार करणं आमच्या फलंदाजांसाठी अवघड नव्हतं. पण सुरूवातीलाच तीन महत्त्वाचे गडी बाद झाले. त्यामुळे आमचा डाव सावरण्याचा वेळच फलंदाजांना मिळाला नाही. गोलंदाजीसाठी पिच उत्तम असतानाही सौरभ तिवारीने चांगली फलंदाजी केली. त्याचं कौतुक करायलाच हवं. पण इतर फलंदाजांनी निराशा केली आणि आम्ही पराभूत झालो”, असं पोलार्ड म्हणाला.