टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्रीसंघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार?
मुंबई – टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघाच्या टी-२० चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा विराट कोहलीने गुरुवारी केली. असे असतानाच आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री यानेही संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत.
मला वाटते की जे काही साध्य करायचे होते, ते साध्य करून झाले आहे. मी त्यावर समाधानी आहे. त्यामुळे ही टी-२० विश्वचषक स्पर्धा संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची माझी शेवटची जबाबदारी असेल, असे रवी शास्त्रीने म्हटले आहे.भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री २०१७ पासून भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे. त्याने काही काळ भारतीय संघाचा व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. आगामी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपली शेवटची नेमणूक असेल का? असा प्रश्न ‘द गार्डियन’ने विचारला होता. त्यावर उत्तर देताना रवी शास्त्री म्हणाला की, मला जे काही साध्य करायचे होते ते साध्य केले आहे. त्याचे मला समाधान आहे. माझ्या कारकिर्दीत संघाने ५ वर्षांच्या कार्यकाळात खूप काही साध्य केले आहे. त्यावर मी समाधानी आहे. ५ वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये संघ पहिल्या स्थानावर राहिला. दोनदा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये विजय मिळवला. या उन्हाळ्याच्या सुरुवातीला मायकल अथरर्टनशी बोललो होतो. त्याला सांगितले होते की, टी-२० विश्वचषक ही स्पर्धा माझ्यासाठी शेवटचे असेल. कोविडच्या काळात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवले, इंग्लंडलाही पराभूत केले. आम्ही इंग्लंडमध्ये २-१ अशी मालिका जिंकली. लॉर्डस् आणि ओव्हरमध्ये आम्ही केलेला खेळ विशेष उल्लेखनीय होता. आगामी टी-२० विश्वचषक जर जिंकला तर ती माझ्या कारकीर्दीतील सर्वोच्च कामगिरी असेल. ४० वर्षांच्या माझ्या क्रिकेट जीवनातील तो सर्वात समाधानाचा क्षण असेल, असे रवी शास्त्रीने यावेळी सांगितले.