पत्नीसह महिलेचा खून करणारा ताब्यात; वाई तालुक्यात खळबळ
वाई |
एका महिलेचा खून करून फरारी झालेल्या संशयित आरोपीस भुईंज पोलिसांनी कर्नाटकात जाऊन त्याला ताब्यात घेतले. नितीन गोळे असे संशयित आरोपीचे नाव आहे.त्याच्याकडे अधिक चौकशी करत असताना त्याने पत्नीचाही खून करून मृतदेह डोंगर परिसरात पुरल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला. सातारा बस स्थानकावरून ३१ ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या संध्या विजय शिंदे (वय ३४, रा. कारी, ता. सातारा) या विवाहितेचा असले (ता. वाई) परिसरात खून झाला होता. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून खून करणारा संशयित नितीन गोळे (व्याहळी ता. वाई) हा संशयित फरारी होता. त्याला पकडण्यासाठी भुईंज येथून पोलीस पथके रवाना झाली होती. संशयित आरोपीला पोलिसांनी कर्नाटकातून दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते.
पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत असताना त्याने अडीच वर्षांपूर्वी पत्नी मनीषा (वय ३४) चाही खून करून मृतदेह डोंगर परिसरात पुरल्याचे सांगितले. सातारा पोलीस बुधवारपासून जंगलात खोदकाम करत होते. दि. ११ ऑगस्ट २०१६ रोजी स्वयंघोषित डॉक्टर संतोष पोळ याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने सहा खून करून ते स्वत:च्या फार्महाउसध्ये पुरल्याचे उघडकीस आले होते. त्याची आज पुनरावृत्ती झाली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. वाई पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे खराडे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस कर्मचाऱ्यांनी याकामी शिकस्त केली.अधिक तपास पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.