#BDDChawlRedevelopment: काल भूमिपूजन आज काम सुरु- जितेंद्र आव्हाड
मुंबई |
ऐतिहासिक वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर सुरुवात झाली असून वरळी जांबोरी मैदान येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. आजपासून पुढील ३६ महिन्यांत पुनर्वसन इमारतीचे काम पूर्ण करत रहिवाशांना घराच्या चाव्या देऊ, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. भूमिपूजन झाल्याझाल्या लगेचच कामाला सुरुवात झाली, असं म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या कामाचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
#BDD चे काम सुरु ….काल भूमिपूजन आज काम सुरु pic.twitter.com/9SgngoVLVp
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 2, 2021
वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे १०० वर्षे जुन्या या चाळींचा पुनर्विकास राज्य सरकारने म्हाडाकडे सोपवला. पण चार वर्षे झाली तरी प्रकल्पाच्या कामाला मात्र सुरुवात झाली नव्हती. सर्व अडचणी सोडवत अखेर सरकारने आणि म्हाडाने आता वरळीच्या कामाला सुरुवात केली आहे. आता लवकरच ना. म. जोशी मार्ग आणि नायगावमधील प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. तिन्ही ठिकाणच्या १९५ चाळींचा पुनर्विकास करत १५ हजार ५९३ रहिवाशांना ५०० चौ फुटांचे घर देण्यात येणार आहे. या परिसरातील पात्र झोपडपट्टीवासीयांना २६९ चौ फुटांची घरे देण्यात येणार आहेत. या चाळींमध्ये २०१० पर्यंत राहणाऱ्या २९३७ पोलीस कर्मचाऱ्यांनाही घरे देण्यात येणार असल्याचे यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.