मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल देशमुख यांना झटका, सादर केलेली याचिका फेटाळली
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकार या दोघांच्याही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांनी केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. तर अनिल देशमुख प्रकरणात दाखल गुन्ह्यातील दोन मुद्दे वगळावे या मागणीसाठी राज्य सरकारने केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली. त्यामुळे अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारलाही हा मोठा धक्का मानला जात आहे.
भ्रष्टाचाराच्या कथित आरोप प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी तर या गुन्हयातील काही भाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारनं केलेल्या याचिकेवर आज निर्णय येणं अपेक्षित आहे. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे.जमादार यांच्या खंडपीठानं या दोन्ही याचिकांवरील युक्तीवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता.
राज्य सरकारला निकालावर दोन आठवडे स्थगिती हवी होती, कारण त्यांना सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची होती, मात्र हायकोर्टाने निकालास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, अनिल देशमुख यांच्याबाबत देण्यात आलेल्या निकालालाही स्थगिती देण्याची अनिल देशमुख यांच्या वकिलाची मागणी होती. सीबीआयचा गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका करण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने ही याचिकाही फेटाळली आहे.