कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचेनेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने देशमुख यांची सुमारे चार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. त्यावरून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ईडीलाच सवाल केला आहे. एखाद्या आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते?, असा सवालच हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणल्याची बातमी आल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधला. परमवीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी मुकेश अंबानी यांच्या घरा बाहेर स्फोटक ठेवली त्याचा अजूनही उलगडा झाला नाही. वाझेची चौकशी बाजूलाच राहिली. अंबानींच्या घरापुढे कुणी व का ठेवली? मास्टर माईंड कोण याचा शोध एनआयए घेऊ शकली नाही. मात्र आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते?, असा सवाल करतानाच मुद्दाम हे षडयंत्र सुरू आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केल्याने देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सीबीआय, ईडी या सारख्या तपास यंत्रणेच्या संस्था भाजपच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. या तपास संस्था जे जे विरोधक असतील त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने काम करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.