सांगलीत पुन्हा कडक निर्बंध; चहा, पान टपरी, स्टॉल बंद
सांगली – सांगली जिल्ह्यात कोरोना पुन्हा फोफावला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या वर गेला आहे. त्याचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रस्त्याच्या कडेला असलेल्या चहा व पान टपरी, खाद्यपदार्थांचे स्टॉल, आठवडा बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सांगली जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत चौथ्या स्तराचे नियम लागू केले असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी पालिका आणि पोलिसांना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ही रुग्णवाढ आता रोज हजाराच्या घरात पोहोचली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या वर आणि २० टक्क्यांच्या आत असल्यामुळे जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार १९ जुलैपर्यंत येथे चौथ्या स्तरातील निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधात जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असणारी सर्व प्रकारची खाद्यपदार्थ विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय विनापरवाना व्यवसायांवरही बंदी घातली आहे. आठवडी बाजार बंद केले असून अत्यावश्यक सेवेतील वस्तू घरपोच देण्याची परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. याशिवाय भाजी मंडईत भाजी विक्रीला परवानगी दिली आहे.