शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची पावती जपून ठेवण्याची सूचना- कृषी खाते
![Instructions to the farmers to keep the receipt of purchase of seeds - Department of Agriculture](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/biyane.jpg)
- बियाणे बनावट निघाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
पुणे |
बियाणे खरेदीची पावती जपून ठेवा, अशी सूचना कृषी खात्याने शेतकऱ्यांना केली आहे. मागच्या वर्षीचे बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विभागाने हे खबरदारीचे पाऊल टाकले आहे. गतवर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत अनेक तक्रारी उद्भवल्या होत्या. बियाणे बोगस निघाल्याची सार्वत्रिक तक्रार होती. तसेच कमी उगवणशक्तीचे बियाणे बाजारात विकल्याच्याही तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर पेरणी केलेल्या बियाण्यांचे देयक, पिशवी, टॅग व तत्सम वस्तू सांभाळून ठेवण्याची सूचना कृषी खात्याने केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून खरीप हंगामातील सोयाबीनचे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन झाले नाही. त्यातच सोयाबीनवर खोडमाशी व चक्रभुंगा या किडीचा प्रार्दुभाव सुरू झाला. अनियमित पावसामुळे पिकांना फटका बसला. प्रामुख्याने सोयाबीन कापणीवेळीच अति पाऊस झाल्याने बियाणे अंकुरले. त्यामुळे सोयाबीनची उगवणक्षमता कमी राहण्याची भीती व्यक्त केली गेली.
सोबतच बाजारात उपलब्ध बियाण्यांची उगवण क्षमता निकृष्ट राहू शकते. त्याचा फटका उत्पादन कमी होऊन शेतकऱ्यांना बसू शकतो. बियाण्यांची अशी स्थिती असल्याने खासगी कंपन्यांकडे असलेल्या बियाण्यांचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत कृषी अधीक्षक डॉ. विद्या मानकर म्हणाले, यावर्षीच्या खरीप हंगामात पिकाचे फेरपालट करून जमिनीची सुपीकता साधावी. अन्य पर्यायी पिकांची लागवड करावी. म्हणजेच सोयाबीनऐवजी तूर, मूग, उडीद, हळद आदी पिके घेता येतील. सोयाबीन हे आंतरपीक म्हणून घ्यावे. त्यामुळे बियाणे कमी लागेल. जे.एस. ३३५ हे बियाणेसुद्धा वापरण्यास हरकत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:चे सोयाबीन बियाणे उपलब्ध आहे, त्याची उगवणक्षमता तपासावी. पेरणीयोग्य असल्यास वरम्बा पद्धतीने लागवड करावी. साधारणत: एका एकरात २२ किलो बियाण्यांची लागवड केल्यास बचत होते.
- जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात पेरणीचे आवाहन
मूग किंवा उडीद पीक घेण्याची सूचना कृषी खात्याने केली आहे. सोबतच मूग?कोपरगाव, पीकेव्ही गोल्ड, पीकेव्ही मूग तर उडीद पिकासाठी टी.९, टीयू २,४ किंवा पीकेव्ही उडीद १५ या वाणांची शिफारस केली आहे. तसेच जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही गावांमध्ये हळद बेणं उपलब्ध आहे. अशा गावातील शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी हळद पिकाचा पर्याय निवडावा. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी खत बचत मोहीम या हंगामात राबवण्यात येत असून त्यात सहभागी व्हावे. सोयाबीन, कापूस, उस व अन्य पिकांसाठी खताचे फायदेशीर पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जैविक खते, व्हर्मिक पोस्ट, गांडूळखत याचा वापर वाढवण्याबाबत प्रोत्साहन देण्याचे धोरण कृषी खात्याने स्वीकारले आहे.
वाचा- कोरोना बाधितांची माहिती भाजपकडे जाते कशी?, संजोग वाघेरे पाटील यांचा सवाल