गेल्या २४ तासांत देशात आढळले ४ लाखांहून अधिक रुग्ण, मृतांचा आकडाही साडेतीन हजारपेक्षा जास्त
नवी दिल्ली – देशात २४ तासांत ४ लाख १ हजार ९९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आजचा हा आकडा सर्वाधिक असून नियमित सर्वाधिक रुग्णांची भर पडत असल्याने देशातील कोरोना परिस्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे.
आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ झाला आहे. 3 हजार 523 कोरोनाग्रस्तांना कालच्या दिवसात प्राण गमवावे लागले. एकूण कोरोनाबळींचा आकडा 2 लाख 11 हजार 853 झाला आहे.
एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं त्सुनामीसारखाच रौद्रावतार घेतला. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह देशातील विविध राज्यात नागरिकांचे मदतीसाठीचे टाहो कानावर येऊ लागले. आधी रुग्णालयांबाहेर रांगा दिसत होत्या, नंतर स्मशानभूमी कब्रस्थानं यांच्याबाहेर मृतदेहांच्या रांगा लागल्याच्या दृश्यांनी देशातील परिस्थिती कोलमडत असल्याचं दिसून आलं. एप्रिलमध्ये करोनानं मृत्यूचं तांडवच घातलं. अवघ्या तीस दिवसांत देशात ४५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला. बेड न मिळाल्याने, ऑक्सिजनअभावी, रेमडेसिवीर न मिळाल्याने, तर कुणाचा घरीच…
१ एप्रिल रोजी देशातील एकूण करोना रुग्णसंख्या होती १,२३,०२,११५ आणि एकूण मृत्यू संख्या होती १,६३,४२८. तर देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ६,१०,९२९ इतकी. ही सख्या ३० एप्रिल रोजी प्रचंड बदलून गेली. ३० एप्रिल रोजी देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या पोहोचली १,८७,५४,९८४ आणि मृतांचा आकडा पोहोचला २,०८,३१३ वर. तर ३० एप्रिल रोजी देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ३१,६४,८२५ इतकी.