राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई – आज महाराष्ट्र राज्य स्थपानेचा ६१ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुताम्त्यांना अभिवादन केले.
आज सकाळी हुतात्मा चौक येथील स्मारकास मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,मुख्य सचिव सीताराम कुंटे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर हे देखील उपस्थित होते. या सर्वांनीही हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिन तसेच राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. pic.twitter.com/oSaIQ4pQQa
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2021
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील कोरोना संकटाचे भान ठेवून यंदा 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. गेल्या वर्षीही कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा राज्याच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन कोरोना संकटामुळे साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.