लसीनंतर भारतात आता कोरोनावर प्रभावी औषधही येणार, चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी
![# Covid-19: Artificial scarcity from drug companies; Guardian Minister Hassan Mushrif's warning to smile](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/CoronaMedicine_240620_4.jpg)
मुंबई – कोरोनावर प्रभावी लस आली असली तरीही अद्यापही प्रभावी औषध तयार झालेलं नाही. मात्र औषधाच्या लढ्यालाही आता मोठं यश आलं आहे. भारताने हे कोरोनाविरोधातील औषध तयार केलं असून या औषधाची प्राथमिक चाचणी यशस्वी झाली आहे. पण आता सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने (CCMB) विन्स बायोटेकसोबत मिळून अँटी कोरोना औषध तयार केलं आहे. विन्स बायोटेक ही विषावरील औषध तयार करणारी कंपनी आहे. अँटी कोरोना औषधाचं घोड्यांवर ट्रायल करण्यात आलं. ते यशस्वी झालं आहे. आता लवकरच या औषधाची मानवी चाचणीही सुरू केली जाईल.
एका हिंदी वृत्तापत्रातील वृत्तानुसार, CCMB चे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितलं, त्यांनी जीनोम सिक्वेंसिंग लॅबमध्ये कोरोनाव्हायरस तयार केला आणि त्याला कल्चर केलं. त्यानंतर त्या व्हायरसला मृत केलं. या मृत कोरोनाव्हायरस घोड्यांमध्ये इंजेक्शनमार्फत सोडण्यात आला. त्यानंतर 15 ते 25 दिवसांत घोड्यामध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडी तयार झाला. 3 हजार घोड्यांवर ट्रायल घेण्यात आलं. जे पूर्णपणे यशस्वी झालं आहे. आता विन्स कंपनीने ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाकडे (DGCI) या औषधाच्या ह्युमन ट्रायलसाठी अर्ज केला आहे. याला लवकरच परवानगी मिळेल अशी आशा आहे.
अँटी कोविड ड्रग हे अँटी वेनम तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलं आहे. जसं एखाद्या सापावरील औषध तयार करण्यासाठी घोड्याच्या शरीरात सापाचं थोडंसं विष इंजेक्ट केलं जातं, त्याच्या शरीरात त्याविरोधात अँटिबॉडी तयार होतात आणि त्यानंतर घोड्याचं रक्त काढून अँटिबॉडी शुद्ध केले जातात आणि ते मग ज्या माणसाला साप चावला आहे, त्याला इंजेक्ट केले जातात, असं संशोधकांनी सांगितलं.
माणसांमध्येही असा निष्क्रिय व्हायरस सोडून अँटिबॉडी तयार करता येऊ शकते पण त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात औषध बनवण्यासाठी इतकं रक्त काढू शकत नाही. पण घोड्याच्या शरीरातील खूप वेळा 2 लीटर रक्त काढता येऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणात औषध तयार करता येऊ शकतं, असं संशोधक म्हणाले.