देशात 24 तासांत 2,95,041 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; 2,023 मृत्यू
नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्लीपाठोपाठ देशातील इतर राज्यांतही कोरोनाने हातपाय पसरले असून दररोज धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. देशात आज पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली असून मृत्यूचा आकडा दोन हजारांच्या पुढे आहे. देशात मागील 24 तासांत तब्बल 2,95,041 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 2,023 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,56,16,130 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,82,553 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 1,67,457 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,32,76,039 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 21,57,538 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
India reports 2,95,041 new #COVID19 cases, 2,023 deaths and 1,67,457 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,56,16,130
Total recoveries: 1,32,76,039
Death toll: 1,82,553
Active cases: 21,57,538Total vaccination: 13,01,19,310 pic.twitter.com/YrLu5MVdbl
— ANI (@ANI) April 21, 2021
गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. दरम्यान, २०२० साली भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.