‘वाझेंना दुसऱ्या वकिलाची गरज नाही, मुख्यमंत्री ठाकरेच त्यांचे वकील’, फडणवीसांची बोचरी टीका
मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केले आहेत. सोबतच, वाझेंचा राजीनामा घेण्याची मागणी देखील फडणवीसांनी केली आहे. अधिवेशनादरम्यान हिरेन आणि वाझेंवरून भाजपने ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री ठाकरे हे सचिन वाझेंचा बचाव करत असल्याचा आरोप देखील फडणवीसांनी केला आहे.
सचिन वाझे यांच्याकडे नक्कीच असं काहीतरी आहे की ज्यामुळे ते सरकार हलवूही शकतात आणि घालवूही शकतात, असे फडणवीस म्हणाले. अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
वाचा :-पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की…’, अजित पवारांचे वक्तव्य
फडणवीस म्हणाले की, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जातो आणि सचिन वाझेंना वाचवलं जातं. सचिन वाझेंना वकिलाची गरजच नाही. त्यांच्यासाठी वकील उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसरा वकील नेमण्याची गरज नाही. त्यांच्याविरूद्ध इतके पुरावे आहेत, अशा व्यक्तीला मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देखील फडणवीसांनी केला.
सचिन वाझेंकडे असे कोणते पुरावे आहेत? ज्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांना वाचवावं लागतं आहे, असा सवाल देखील फडणवीसांनी विचारला.