‘लकी ड्रॉ’मुळे नागरिकांची फसवणूक, सर्वांना घरे द्या
- बाबा कांबळे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी / महाईन्यूज
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत शहरातील नागरिकांना घरकुल देण्यासाठी आज (दि. २७) रोजी लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉ मुळे नागरिकांची फसवणूक झाली असून, फक्त ३ हजार ६६४ व्यक्तींनाच घरकुल मिळाले आहे.
प्रत्यक्ष मात्र, एकूण ४८ हजार ७५२ लाभार्थ्यांनी अर्ज भरलेले होते. या लाभार्थ्यांना पालिकेने घर देणे अपेक्षित आहे. परंतु, या योजनेत नागरिकांची मोठी दिशाभूल झाली आहे. उर्वरीत व्यक्तींच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यापूर्वी देखील जेएनएनयुआरएम योजनेत १३६०० घरकुल जाहीर झाले होते.
त्यावेळी देखील लकी ड्रॉ काढून फक्त ६००० व्यक्तींनाच घरकुल मिळाले होते, उर्वरित व्यक्तींवर लकी ड्रॉ मुळे अन्याय झाला होता. लकी ड्रॉ हा पर्याय नसून, बेघरांना घरकुल मिळाले पाहिजे. लकी ड्रॉ रद्द करावा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.