महिला अत्याचार रोखण्यासाठी सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची गरज – ना.डॉ.नीलम गो-हे
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
पिंपरी | प्रतिनिधी
आज समाजात स्त्रियांना बरोबरीचे स्थान मिळत आहे. यांच्या कर्तुत्वास मान्यता मिळत आहे. याचे कारण म्हणजे सावित्रिबाई फुले यांनी केलेला त्याग व पुढाकार होय. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. तसेच सती प्रथेस विरोध केला. बलात्काराने जन्मलेल्या मुलींची हत्या होवू नये, यासाठी बाल हत्या प्रतिबंधक संस्थाची स्थापना केली. मात्र समाजात आजूनही महिलांवरील होणारे अत्याचार व शोषण पाहता सावित्रीबाई फुलेंचे कार्य समाजाने पुन्हा सुरू केले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती ना.डॉ. नीलम गो-हे यांनी केले.
तसेच या वेळी महाराष्ट्रात कृतीदशक २०२० ते २०३० या निमित्ताने महिला प्रबोधन मंच याची स्थापना करीत असल्याची घोषणा केली. समाज व सरकार यांच्या सहकार्याने योजना व महिला विकास कार्यक्रम अंमलबजावणी करण्याचे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन केले.
भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषद उपसभापती ना.डॉ. नीलम गो-हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सिल्व्हर रॉक्स या त्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी स्त्री आधार केंद्राच्या ट्रस्टी जेहलम जोशी, शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिति पदाधिकारी शिरीष फडतरे, लतिका गो-हे, समुपदेशक स्त्री आधारकेंद्राचे शेलार गुरुजी, अनीता शिंदे, अनिता परदेशी, संजय व जयश्री शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.