विजय स्तंभ परिसर विकासासाठी आर्थिक अडचण येऊ देणार नाही, अजित पवारांची ग्वाही
पुणे – कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाचा विकास आराखडा मंजूर करण्याबाबत आणि प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. सर्वांच्या सूचनेचा आदर करत राज्य सरकार या विकास आराखड्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. मी पुण्याचा पालकमंत्री आणि राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक बाजू पूर्णपणे सांभाळली जाईल. त्यात कुठलीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
वाचा :-कोरेगाव भीमाचा इतिहास शाळांमध्ये शिकवला पाहिजे, आठवलेंची मागणी
उपमुख्यमंत्री पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासमवेत सकाळी साडेसहाच्या सुमारास विजय स्तंभास भेट देवून मानवंदना दिली. या वेळी आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत वरील ग्वाही दिली.
ते म्हणाले की, “कोरोनाबरोबरच राज्यावर इतरही संकटे आली. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यावर मात करण्यात आली. राज्यातील जनतेने शांततेचा मार्ग अनुसरला आहे. महाराष्ट्र कधीही चुकीच्या मार्गाने गेलेला नाही, ही आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांनी जो आदर्श घालून दिला, त्यानुसारच वाटचाल सुरू आहे.”
वाचा :-विचार करा कोरोनाच्या काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर… – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“कोरोनाचे संकट असल्यामुळे विजय स्तंभाला घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन राज्याच्या गृह विभागाकडून करण्यात आले होते. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाज बांधवांकडून घरातूनच अभिवादन करण्यात येत आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. महाराष्ट्र ही शूरांची भूमी आहे, हे वेळोवेळी दाखवून दिले आहे,” असे सांगून “”राज्यातील जनतेनेही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.