राज्यातील कापूस खरेदी जून 15 पर्यंत करावी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना
मुंबई |महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या सर्व दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही कापूस खरेदी दि. 15 जून पर्यंत पूर्ण करावी आशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या
आज मंत्रालयातून राज्यातील कापूस खरेदीबाबतचा जिल्हाधिकारी, डिडीआर यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आढावा घेऊन संवाद साधला. त्यावेळी सहकार मंत्री श्री. पाटील यांनी वरील सूचना केल्या.
श्री. पाटील म्हणाले, कापूस खरेदीला गती द्यावी त्यासाठी गाड्यांची मर्यादा वाढवावी, शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या याद्या अद्ययावत कराव्यात ,कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्या-त्या दिवशीच पूर्ण करण्यात यावी, सर्व खरेदी विक्री व्यवहारादरम्यान सोशल डिस्टंसींगचे पालन करावे, इतर राज्यातील कापूस खरेदी संपुष्टात आल्याने सीसीआय ने आपले ग्रेडर राज्यातील केंद्रांवर तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.
राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यात परराज्यातून अवैध मार्गाने येणाऱ्या कापसाच्या खरेदीची शक्यता असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या हद्दींवर चेक पोस्टद्वारे त्यावर नियंत्रण ठेवावे.
वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी ,कापूस खरेदी केंद्रावरील तयार गाठींच्या सकंलनासाठी गोदामे कमी पडणार नाहीत त्यामुळे कापूस खरेदीला गती द्यावी अशा सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या.
यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, सीसीआच्या सीएमडी श्रीमती अल्ली राणी, कॉटन फेडरेशनचे चेअरमन राजाभाऊ देशमुख, व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन संचालक सुनील पवार, वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवशंकर उपस्थित होते.