कोरेगाव भीमाचा इतिहास शाळांमध्ये शिकवला पाहिजे, आठवलेंची मागणी
![Koregaon Bhima war should include in education books](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/athavale.jpg)
कोरेगाव भीमा येथील लढाईचा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश झाला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले यांनी केली. रामदास आठवले यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मागणी केली.
काय म्हणाले आठवले
कोरेगाव भीमाचा इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. त्यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहीन व त्यांच्याशी चर्चाही करेन, असे रामदास आठवले यांनी सांगितले. देशात दलित समाजावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. त्यासाठी देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. तसेच देशातील दलित-सवर्ण हा वाद मिटला पाहिजे. गावागावात एकी झाली पाहिजे. सवर्ण आणि दलितांमध्ये एकी झाली की, देशाचा विकास झपाट्याने होईल. 2021 मध्ये दलितांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला.
वाचाः फायजर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी
नवीन वर्षात रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करण्यासाठी ‘मी रिपब्लिकन’ ही आमची घोषणा असेल, असे आठवलेंनी सांगितले. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केलेल्या टीकेला रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याकडे कोणताही प्लॅन नाही, हे मला माहिती आहे. पण केंद्र सरकारकडे अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ठोस योजना आहे. आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर मदत केली जाईल, असे ते म्हणाले.