पवना , मुळा व इंद्रायणी नद्यांचे सुशोभीकरण करा
माजी खासदार गजानन बाबर यांची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांचे सुशोभीकरण करून पर्यटनासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, तसेच त्यास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. पर्यटन व पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे यांना त्याबाबत निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. ही संतांची भूमी म्हणून तिचा नावलौकिक आहे. तसेच या भूमिकेतूनच पवना ,मुळा व इंद्रायणी नद्या वाहतात. औद्योगिकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पिंपरी-चिंचवड शहरात नागरीक उदरनिर्वाहासाठी येत आहेत. टाटा मोटर्स, जनरल मोटर्स, बजाज, आयटी हब, यासारख्या मोठ-मोठ्या कंपन्या येथे आहेत. तसेच देहू, आळंदी यासारख्या तीर्थ क्षेत्रामुळे तसेच पिंपरी-चिंचवड शहरालगत असणाऱ्या लेण्या व गडकिल्ले यामुळे बहुसंख्य पर्यटक येथे येतात.
शहरातील नद्यांचा उपयोग व त्यांचे सुशोभीकरण केले तर नद्याही प्रदूषण मुक्त होऊन पर्यटनाला चालना मिळायला उपयोग होईल. अनेकांना रोजगारही प्राप्त होईल. त्यामुळे आपण यावर गांभीर्याने विचार करने गरजेचे आहे. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणपूरक, रोजगाराच्या दृष्टीकोनातून तसेच पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नदीसंवर्धन, सुशोभीकरण करावे तसेच या नद्यांवर पर्यटनासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा जेणेकरून स्थानिक लोकांना रोजगार तसेच नद्या प्रदूषणमुक्त झाल्यामुळे चांगले आरोग्य प्राप्त होईल, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली.