कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या प्रमाणाची सक्ती करू नका
पॅकेज्ड ड्रीकिंग वॉटर उत्पादकांची मागणी
पुणे : प्रतिनिधी
पॅकेज्ङ् ड्रिकिंग वॉटर मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या प्रमाणाची सक्ती करण्याविषयी शासनाने जारी केलेला अध्यादेश मागे घ्यावा, अशी मागणी पॅकेज्ड ड्रीकिंग वॉटर उत्पादकांनी केली आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पॅकेज्ड ड्रींकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास राव, उपाध्यक्ष विजयसिंह डुबल, सरचिटणीस अपुर्वा दोशी यांनी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पाण्याच्या बाटल्यांसाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वामुळे पॅकेज्ड पाणी तयार करण्याची पद्धत बदलणार आहे. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक लीटर पाण्याच्या बाटलीत 20 मिलीग्रॅम कॅल्शियम तसेच 10 मिलीग्रॅम मॅग्नेशियम एकत्र करावे लागणार आहे. मिनरल्स हे चवीसाठी चांगले मानले जातात. मात्र फिल्टरच्या प्रकियेत ते काढले जातात. परंतु ग्राहकांच्या फायद्यासाठी ते पुन्हा टाकण्यात येणार आहेत. हा आदेश लागू करण्यासाठी कंपन्यांना दोन वेळ देण्यात आला होता. मात्र, आता हा आदेश लागू करण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2020ची तारिख निश्चित केली. त्यामुळे आता हा नियम 1 जानेवारी 2021पासून लागू होईल. यालाच असोसिएशनने विरोध केला आहे. इतर शीतपेयांना ही सक्ती नाही, मग मिनरल वॉटरलाच का ? असा प्रश्नही असोसिएशनने विचारला आहे. या विषयी अधिक संशोधन व्हावे, जागतिक प्रवाह तपासावेत, आणि मिनरल वॉटर इंडस्ट्रीला त्यासाठी वेळ द्यावा, असेही असोसिएशनने म्हटले आहे.