टाटा कंपनी तामिळनाडूत मोबाईलचे पार्ट बनवण्याचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत
मुंबई टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता आणखी विस्तारणार आहे. या विस्तारण योजनेअंतर्गत कंपनी सर्व सेक्टर्समधील त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सुरुवातीला सुपर अॅपद्वारे ऑनलाईन ग्रोसरीच्या व्यवसायात उतरण्याची योजना बनवली.
आता मोबाईलचे पार्ट बनवण्यासाठी कंपनीने कंबर कसली आहे. यासाठी टाटा सन्स कंपनी तामिळनाडूमध्ये एक मोठा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे.
मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मोबाईल हँडसेट निर्मिती करणार्या कंपन्यांना भारतात मोबाईलचे पार्ट विकसित करण्याचे आवाहन केले होते. मात्र या आवाहनाला कोणत्याही कंपनीने प्रतिसाद दिला नव्हता. अजूनही आपल्या देशातील मोबाईल कंपन्या मोबाईलचे पार्ट चीनसह अन्य देशातून मागवत आहेत. अखेर टाटा कंपनीने यामध्ये रस दाखवला असून टाटा कंपनीने त्यासाठी योजनादेखील बनवली आहे. भारत हा चिनी मोबाईल कंपन्यांचे सर्वात मोठे मार्केट आहे. तसेच भारतातील मोबाईल कंपन्यादेखील चीनमधूनच मोबाईलचे पार्ट मागवतात. त्यामुळे जर भारत मोबाईलचे पार्ट आणि मोबाईल बनवण्यात सक्षम बनला तर चीनला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.