मुख्यमंत्र्यांनी घरातच बसावे; प्रवीण दरेकरांची बोचरी टीका
सांगली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवरून पाहणी दौरे करीत आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळणार नसेल तर, अशा दौऱ्यांचा काहीच उपयोग नाही. यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी घरात बसावे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखवून राजकारण करीत आहेत,’ असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. सांगली जिल्ह्यातील झरे येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते दरेकर मंगळवारपासून सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी आटपाडी तालुक्यातील झरे परिसरात शेतीची पाहणी केली. चिखल आणि ओबडधोबड रस्त्यातून चारचाकी वाहन जाणे शक्य नसल्याने ते थेट बैलगाडीत बसून नुकसान झालेल्या शेतांपर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांचे पाहणी दौरे रेड कार्पेटवरून होत आहेत. या दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावे. मात्र, शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी.’
‘एकीकडे शरद पवार म्हणतात, पंचनामे आणि प्रक्रिया करायला वेळ लागेल आणि दुसरीकडे म्हणतात केंद्र सरकारने तातडीची मदत घ्यावी. याचा अर्थ ते केंद्राकडे बोट दाखवून राजकारण करीत आहे. राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीचे निर्णय घेणे गरजेचे आहे.’ दिवसभरात दरेकर सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, तासगाव परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. झरे येथील पाणी दौर्यात त्यांच्यासोबत आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आदी उपस्थित होते.