पश्चिम रेल्वे मार्गावर आज 28 सप्टेंबर पासून 2 महिला विशेष आणि 4 अन्य लोकलच्या फेर्या वाढवल्या जाणार
मुंबईमध्ये मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुन्हा व्यवहार सुरू झाले आहेत. कामाच्या निमित्ताने आता काही कर्मचार्यांचा रेल्वे प्रवास देखील सुरू झाला आहे. मात्र सातत्याने या काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष उपनगरीय रेल्वे सेवे अंतर्गत चालवल्या जाणार्या मुंबई लोकलमध्ये गर्दी असल्याने सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजले होते. त्यावर उपाय म्हणून मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर आज 28 सप्टेंबर पासून 2 महिला विशेष आणि 4 अन्य फेर्या वाढवल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरील विशेष लोकल विरार- चर्चगेट- विरार मार्गावर चालवली जाणार आहे. दरम्यान विरार वरून सकाळी 7.35 ला विशेष गाडी सुटेल ती चर्चगेटला 9.22 ला पोहचेल तर संध्याकाळी चर्चगेटवरून 6.10 ला सुटणारी लोकल 7.55 ला पोहचणार आहे. यासोबत विरार अप-डाऊन मार्गामध्ये 6 फेर्या धीम्या मार्गावर देखील वाढवल्या जाणार आहेत.
मध्यंतरी अनेक रेल्वे स्थानकांवर सामान्य नोकर व्यक्तींनी मुंबई लोकलमध्ये सर्वांना प्रवेशाची मुभा मिळावी म्हणून आंदोलन करण्यात आले होते. 2 दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसामुळे लोकलमध्ये तोबा गर्दीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र आता यावर मार्ग काढत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर फेर्या वाढवण्यात आल्या आहे. आता एकूण 506 फेर्या दिवसाला चालवल्या जाणार आहेत.
आजपासून पश्चिम रेल्वे मार्गावर वाढवल्या जाणार्या 6 नव्या ट्रेनमुळे 2000 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या वाढीव रेल्वे फेर्यांच्या माध्यमातून प्रवास करताना देखील प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. दरम्यान मास्क घालणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं गरजेचे आहे. तसेच या अधिकच्या रेल्वे फेर्यांमधून आजापासून केवळ राज्य सरकारने परवानगी देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि परीक्षार्थींना परवानगी असेल. सामान्य मुंबईकरांना अद्याप मुंबई लोकल मधून प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना संकटकाळात बाहेर पडताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.